Thursday, April 15, 2010

जावळीच्या मोऱ्याचा आधुनिक अवतार, नंदकुमार जावळे!

नंदकुमार जावळे यांचा ११ एप्रिलचा लेख वाचला, लेख वाचून लेखकांची कीव आली. वसई परिसर हे काही एक छोटे गाव नाही जिथे १०-१२ लोक फिरून बंद जवळपास १००% पर्यंत यशस्वी होईल. माननीय आमदार विवेकभाऊ पंडित आणि इतर आंदोलकांच्या अटकेच्या निषेधार्थ ती एक उस्फुर्थ जन-प्रतिक्रिया होती.
लेखक सांगताहेत की उमराळे, करमाळे, बोळिंजसारखी गावे महानगरपालिकेतून वगळणे चूक आहे कारण ती महानगरपालिकेच्या हद्दीला जोडलेली आहेत; उद्या लेखक असेही म्हणेल की काश्मीर पाकिस्तानच्या हद्दीला जोडलेले आहे तेव्हा त्याचा समावेश पाकिस्तानमध्ये व्हावा. लेखक या गावातील लोकांच्या भावनेचा बिलकुल विचार करत नाहीयेत. या लोकांनी अगोदरच ग्रामसभेद्वारे आपला विरोध दर्शवला आहे आणी जर का पुन्हा एकदा जनमत चाचणी घेतली तर खरे चित्र आपणासमोर येईल.
आमदार विवेक पंडित हे नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे लक्ष देत आहेतच, वसईतील नवीन व सुस्थितीतील रस्ते आपणास हेच दर्शवत आहेत. मात्र त्यांनी हे आंदोलन थांबवावे आणी फक्त या मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे हे कोणते ग्रामस्थ लेखकांना सांगताहेत हाच प्रश्न आहे. लोकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळते की नाही याची विचारणा १० वर्षात केली नाही असे लेखक म्हणताहेत मात्र गेल्या १० वर्षात नव्हे तर मागील २० वर्षांपासून वसईत कोणाची सत्ता होती याच लेखकांना विसर पडलेला दिसतोय.
सर्व राष्ट्रीय आणी स्थानिक राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, सामान्य नागरिक एकत्र येऊन हा लढा देत असताना तो फक्त एका विशिष्ठ समाजाचा आहे असे लेखक कुठल्या आधारावर म्हणताहेत हे कृपया स्पष्ट करावे.
आणी हो वसई हा तथाकथित हरित पट्टा नाही आहे, वसईसारखा हिरवागार प्रदेश आपणास शोधूनही सापडणार नाही. जर आपणास ह्याची खात्री करून घ्यायची असेल तर जरूर वसईस भेट दया, आम्ही आपले आदरातिथ्य जरूर करू. वसई पाहून आपले मतपरिवर्तनच नव्हे मनपरिवर्तनदेखील होईल याची आम्ही खात्री देतो.

गेट वेल सून..!!!

No comments:

Post a Comment